रविवार, १२ डिसेंबर, २०१०

स्वातंत्र्यलक्ष्मीचे पुजारी: गोवा

गोवा: पुर्वपीठिका
रविवारी १९ डिसेंबर. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठ्ठ? कॅलेंडरच्या इतर दिवसासारखाच एक दिवस. पण मी म्हणेन आजच्याच दिवशी भारत पूर्णपणे स्वतन्त्र झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताचा स्वातंत्रदिन म्हणुन साजरा होत असला, तरी गोमंतक हा भारताचा अविभाज्य भाग १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतुन स्वतंत्र, मुक्त झाला. म्हणुन हा पुर्ण स्वातंत्रदिन! त्यानिमित्ताने गोव्याबद्दल आणि ह्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सांगायला खूप खूप आवडेल -


गोव्यात पोर्तुगिजांचा प्रवेश

--युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणुन ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी वास्को-द-गामा ह्याला पाठवले (१४९८). वास्को द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लूटणे, बाटाबाटी अशी यशस्वी काम करत आला..कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहुन तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबार्च्या हिंदुंना घेउन गेला. आता तिकडे नेल म्हणजे बाटवण हे तर ओघानच आल. आणि मग परत पाठवुन दिले (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती) वास्को द गामा भारतात येण्यापुर्वीच ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता.

यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची जहाजे/गलबतं भारतात आली ती वाटेत भेटणार्‍या यात्रेकरुंच्या गलबतांची लुटमार, जाळपोळ इ. केल्याशिवाय कधीच राहिली नाहीत.

इ.स १५०३ च्या ६ एप्रीलला पोर्तुगालच्या राजाने अल्फान्सो-दे-आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफ़ा देउन भारताकडे पाठवले. कोचीननजिक किल्वा येथे उतरल्यावर त्याने तिथल्या राजाशी व्यापारासंबधी बोलणी तर केलीच पण तसा करार करताना त्याने एक मागणीही केली. पोर्तुगालतर्फ़े तिथे जो माणुस राहिल त्याच्याकडे तेथिल ख्रिश्चनांचे तंटे बखेडे सोडवण्याचे व न्याय देण्याचे काम सोपवावे. आधी राजा तयार झाला नाही; पण शेवटी त्याने ती मागणी मान्य केली. हा पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाइसरॉय. फ़्रासिंस्कु दि आल्मेदा. ह्याची धोरणे व्यापारविषयक होती पण आल्बुकर्कची महत्वाकांक्षा सत्ता स्थापण्याची होती. पण त्यांना तशी योग्य भूमी मिळत नव्हती.
ही संधी त्यांना मिळाली पण तेव्हा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश होउन ११ वर्षे लोटली होती.
----------
ख्रिस्तपुर्व पहिल्या शतकापासुन इतिहासाचे सिंहावलोकन केले असता गोमांतकावर मौर्य, सातवाहन, अभीर, त्रकुटक, बटपुरा, कल्चुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट्, शिलाहार, कदंब, यादव आदि राजवंशांनी राज्य केले. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याचा सरदार मलिक कफुर याने इ.स १३१२ साली गोमंतकावर स्वारी करुन राजधानी गोपकपट्ट्णची(आत्ताचे गोवा वेल्हा) जाळपोळ केली. ही मुसलमान राज्यकर्त्यांची गोव्यावरील पहिली स्वारी होती..
त्यानंतर हसन बहामनी ने १३५२ ते १३५८ च्या सुमारास स्वारी करुन गोवापुरी बेट कदंब राजांकडुन जिंकुन घेतले. गोवा शहराला त्याने सहा महिने वेढा दिला होता. यावरुन कदंब राजाचा जबरदस्त प्रतिकार दिसतो. याच काळात विजयनगरला हिंदु राज्य स्थापन झाले होते.
----------------

गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हण्जे मलबारी हिंदु स्त्रिया व अरबी मुसलमान यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर भटकळ , होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागत त्यांचे वास्तव्य असे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याला अरबस्थानातुन घोडे आणताना व्यत्यय आणल्याने त्याने त्यांचा नि:पात करायला एका मांडलिकास सांगितले. तर त्याने राजाचा हुकुम शब्दश: पाळला. १०००० हुन अधिक नायट्यांना मारले. जे उरले सुरले नायटे बचावले त्यांनी गोव्याचा आश्रय घेतला व गोव्यातुन विजयनगर संस्थानला त्रास देणे सुरुच ठेवले. तर ह्या नायट्यांनी मुस्लिम राजवटीपासुन गोमांतकीयांना छळणे सुरु केले होते. त्यांना धडा शिकवावा व गोवा सोडून जाण्यास भाग पाडावे यासाठी यासाठी वेर्णे च्या सरदेसायांनी त्यांच्यावर हल्ला केला व कित्येकांना मारुन टाकले . पण एवढे होउनही नायटे गोवा बेट सोडुन गेले नाहीत . तेव्हा सरदेसायांनी लोकांची तक्रार तिमोजा ह्या गोमंतकीय, विजयनगरच्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या कानावर घातली. गोव्यावर हिंदु सत्ता स्थापन व्हावी व त्याचा सुभेदार आपण व्हावे असे तिमोजाला वाटत असे.

मग तिमोजाने होन्नावर येथे असलेल्या फ्रांसिस्कु आल्मेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉय ची भेट घेतली व त्याची मदत मागितली. पुढे तिमोजा व आफोंसो दी आल्बुकर्क ची भेट झाली आणि गोव्यावर स्वारीचा बेत पक्का झाला. पोर्तुगिजांना व्यापार आणि द्रव्य पाहिजे तेवढे मिळाले की संतुष्ट होतील, गोमंतक पुन्हा विजयनगर साम्राज्याचा हिस्सा होइल व आपण सुभेदार बनु अशी तिमोजाची समजुत होती. याउलट येनकेण प्रकारेण हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर आपल्या सत्तेची भूमी असावी अशी आल्बुकर्कची ईच्छा होती. पण ती सफल होत नव्हती करण हिंदुस्थानचे राजे भूमी हातची जाऊ न देण्याबाबत फार जागरूक होते. अशा समयी तिमोजाची कल्पना त्याच्यासाठी खूप मोट्ठी संधी होती.

हा कट शिजत असतानाच गोव्यावर राज्य करणार्‍या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. आणि गोव्यात त्यांचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले. पण झाले भलतेच.


--------------



गोवा जिंकल्यानंतर

आल्बुकर्क शूर होता, तसाच धूर्त मुत्सद्दी होता. गोवा बेट जिंकल्यावर त्याने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सतीची प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.

आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटाबाटी ,लुटालुट  व त्यासाठी जनतेचा अमानुष इ. सगळ राजरोस सुरु झाल. १ एप्रिल१५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!! हे काही सुखासुखी झाल नसेल....

गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिन चा होता. दुसरे चर्च जुने गोवे (old goa) इथे उभारण्यात आले. हे स्थळ गोवा जिंकताना झालेल्या लढाईत , ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला त्या ठिकाणी बांधण्यात आले.

आल्बुकर्कच्या गोव्यात पोर्तुगीज रक्ताची केंद्रे वाढवणे व ख्रिस्ती धर्मप्रसार यांच्या हव्यासामुळे स्त्रिया व कुमारिकांची स्थिती अत्यंत दयनिय झाली होती. एकाही मुस्लिम पुरुषाला जिवंत राहु दिले नव्हते. मग तो सैनिक असो वा साधा नागरिक!! त्यांच्या घरच्या विधवा स्त्रिया, कुमारिका यांना कैदेत ठेवण्यात आले होते. जे कोणी पोर्तुगीज पुरुष त्यांच्याशी लग्नास राजी होत त्यांना त्या स्त्रिया पत्नी म्हणुन दिल्या जात. शिवाय घर, पैसे, कपडे, जमीनही मिळे. इतर स्त्रिया गुलाम म्हणुन जीवन कंठीत. काहींना तर पोर्तुगालला पाठवण्यात आले होते.

ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे २ प्रयत्न इ.स १५१६ व इस १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे ३ महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजाना द्यावे लागले. आणि या विजयाने आल्बुकर्कचा आत्मविश्वास वाढला व त्याची खात्री झाली आता त्याची गोव्यातील सत्ता अबाधित आहे. आणि त्याने जोमाने ख्रिस्ती धर्मप्रचाराला सुरुवात केली.

इस १५३० साली पोर्तुगालचा राजा दीं ज्युआव याने मिंगेल व्हाज नावाच्या धर्मोपदेशकास गोव्याचा धर्माधिकारी म्हणुन पाठविले. आणि धर्मांतरे सुरु झाली. हा राजा त्यावेळी केवळ १९ वर्षांचा होता याच सुमारास गोव्यात कॅथॉलिक बिशपची गादी स्थापन करण्यात आली.

क्रमशः


प्रीतमोहर
सातारकर